समाजाचे सध्याचे विघातक चित्र,
जगण्याचं सूत्र चुकतंय का?
भाऊ काय बहीण काय
नुसता फापट पसारा,
कोण कोणाला विचारतंय
कुणालाही विचारा …
कुणी कोणाकडे जाईना
कुणी कुणाकडे येईना,
जगलात काय मेलात काय
माया कुणाला येईना …
संवेदनशीलता आता
फारशी कुठं दिसत नाही,
बैठकीत किंवा ओसरीवर
गप्पाची मैफिल बसत नाही …
पॅकेज,इनक्रिमेंट,सॅलरी
इन्व्हेस्टमेंट,विकएन्ड,
यातच हल्ली माणसाचा
होत आहे ” दि एंड,”…
ऐषोआरामामध्ये लोळतांना
फाटकं गाव नको वाटतं,
जवळचं नातं असलं तरी
सांगायलाही नको वाटतं …
उच्च शिक्षित असूनही
माणूस आज मॅट वाटतं,
इंटेरियर केलेल्या घरामधे
लुगडं, धोतर ऑड वाटतं..
सगळेच पाहुणे सगळेच मेव्हणे
कसे काय पॉश असतील?
पार्लरमधून आणल्या सारखे,
चिकणे,आयटम कसे दिसतील?
उन्हा तान्हात तळणारी
माणसं काळी पडणारच,
गरिबीनं गांजल्यावर
चेहऱ्याचा रंग उडणारच …
कुरूप ते नाहीत,
कुरूप तू झालास,
प्रेम नात्यावर करायचं सोडून
दिसण्याला भुलून गेलास ..
पात्र कितीही मोठं झालं,
तरी गंगेचं मूळ विसरू नये,
सुख असो का दुःख असो,
आपल्या माणसाला विसरू नये.
दिसण्यावर प्रेम करू नकोस,
आपलं समजून जवळ घे,
एरव्ही नाही आलास तरी
दिवाळीला तरी घरी ये..
कॉम्प्युटरच्या भाषा खूप शिकलास,
माणसावर प्रेम करायला शिक,
नाहीतर मानसिक आरोग्यासाठी
दारोदार मागत फिरशील भीक …
दुसऱ्याचा छळ करून
तुम्ही सुखी होणार नाही,
पॅकेज कितीही मोठं असू द्या,
जगण्यात मजा येणार नाही. .
जग जवळ करतांना
आपली माणसं तोडू नका,
अमृताच्या घड्याला
अविचाराने लाथाडू नका..!
मी का बोलू?
मी का फोन करू?
मी का कमीपणा घेऊ ?
मी का नमते घेऊ ?
मी का नेहमी समजून घ्यायचं?
मी काय कमी आहे का?
असे बरेच सारे ” मी,” आहेत ,
जे आयुष्यात विष कालवतात …
म्हणून,अरे अतिशिकलेल्या माणसा ” मी पणा,”सोड आणि
नाती जोड़ …

