दीपक मोहिते,
वसई तालुक्यात मीटर रिक्षा सुरू होणार — आ.स्नेहा दुबे पंडित
वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येमुळे आणि अपुऱ्या सार्वजनिक वाहन व्यवस्थेमुळे येथील नागरिकांना दैनंदिन प्रवासासाठी रिक्षावर अवलंबून रहावे लागत आहे. मात्र,वसई विरार शहरात अद्यापही मीटर रिक्षा नसल्याने शेअर रिक्षाशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाही.त्यातच शेअर रिक्षा सेवेच्या मनमानी भाडे आकारणे तसेच फक्त मुख्य रस्त्यावर शेअर रिक्षा चालवणे,इ.कारणामुळे वयोवृध्द नागरिक,महीला,विद्यार्थी यांना वसाहतीतील आतील भागामध्ये जाण्यासाठी पायी चालत जावे लागते.बऱ्याच वेळा सामानासह पायी चालत जाणे नागरिकांना अडचणीचे होत असते.
मीटर रिक्षाच्या समस्येबरोबरच शहरामध्ये वाहनांची पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असतो.वसई – नालासोपारा-विरार या स्थानकांच्या बाहेरच्या भागात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
वरील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी आ.स्नेहा दुबे पंडित यांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री,नगरविकास आणि परिवहन मंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला होता.
यासंदर्भात आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या मागणीनुसार काल परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयामध्ये एक बैठक आयोजित केली होती.या बैठकीला आ.स्नेहा दुबे पंडित यांच्यासह वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी,अतिरिक्त परिवहन अधिकारी भरत कळसकर, महाव्यवस्थापक महा.राज्य परिवहन महामंडळ,दिनेश महाजन,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,वसई,सोनाली सोनार,मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे उपायुक्त अशोक विरकर, अतिरिक्त पालिका आयुक्त दिपक सावंत हजर होते.
सदर बैठकीमध्ये वसईतील वाहन पार्किंगची समस्या आणि मीटर रिक्षा यावर सविस्तर चर्चा झाली.या चर्चेअंती परिवहन मंत्री महोदय यांनी १५ नोव्हें.पासून वसई विरार शहरात मीटर रिक्षा सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले तसेच पार्किंगची व्यवस्था करण्याचे व वसईतील एस.टी. महामंडळाच्या जागेचा पी.पी.पी. तत्वावर विकास करून त्याठिकाणी वाहनतळ व इतर सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी डिसें.अखेर आराखडा सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

