दीपक मोहिते,
” खळबळजनक,”
आजच्या कारवाईनंतर ईडीच्या रडारवर अनेक बिल्डर,
आजची सकाळ,ही वसई विरार परिसरातील
आर्किटेक्टस व मनपा अभियंत्यासाठी भितीने गाळण उडवणारी ठरली आहे. महानगरपालिकेच्या नगर रचना संचालकावर गेल्या मे महिन्यात ईडीचे छापे पडल्यानंतर बांधकाम व्यवसायिक,महानगरपालिका अधिकारी,अनधिकृत बांधकामातून रग्गड वसुली करणारे अधिकारी व राजकीय नेत्यांची चड्डी पिवळी झाली होती.अनेक आर्किटेक्टस व बिल्डरांनी परदेशात व गुजरात राज्यात पळ काढला होता. परिस्थिती निवळल्यानंतर अनेक जण पुन्हा वसईमध्ये परतले होते.पण त्यांच्यासाठी मंगळावर हा आज घातवार ठरला आहे.
सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) आज सकाळी वसई,विरारमधील वास्तुविशारद ( आर्किटेक्ट ) आणि पालिका अभियंत्यांच्या निवासस्थानी छापे टाकले.नालासोपारामधील ४१ अनधिकृत इमारत प्रकरणात पालिकेचे माजी नगररचना संचालक वाय.एस.रेड्डी यांच्यावरील कारवाईनंतर मिळालेल्या माहितीनंतर हे छापे टाकण्यात आले आहेत. वसई आणि मुंबईतील एकूण १३ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईमुळे वसई,विरारमध्ये एकच खळबळ उडाली असुन आर्किटेक्ट,मनपाचे अधिकारी व अनेक बिल्डरांची भितीने गाळण उडाली आहे.पुढील आठवड्यात सक्तवसुली संचलनालयाची कारवाई पुन्हा सुरू होणार आहे.त्यांच्या रडारवर अनेक बिल्डर व महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आहेत.
सक्तवसुली संचलनालयाने ( ईडी ) १४ मे रोजी वसई, विरार महापालिकेचे माजी नगररचना संचालक वाय.एस. रेड्डी यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानासह वसई, विरारमधील १३ ठिकाणी छापे टाकले होते.यावेळी रेड्डी यांच्या घरातून ३२ कोटी रु.चे सोने आणि रोकड जप्त केली होती.रेड्डी यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता आली कुठून ? याचा ईडी तपास करीत होती.त्या माहितीच्या अनुषंगाने आजची कारवाई करण्यात आली.
सक्तवसुली संचलनालयाने ( ईडी ) सोमवारी अचानक या प्रकरणाशी संबंधित वास्तुविशारद आणि नगररचना ( टाऊन प्लानिंग ) विभागातील अभियंत्याच्या घरी छापे टाकले.वसई आणि मुंबईतील १३ ठिकाणी ही कारवाई सुरू होती.या कारवाईचा अधिकृत तपशील अद्याप ईडीकडून जाहीर करण्यात आलेला नाही. इमारतींंना परवानगी देण्यासाठी वास्तुविशारदांच्या माध्यमातून मोठा आर्थिक व्यवहार केला जात असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.रोख रकमेऐवजी सोन्याच्या माध्यमातून व्यवहार करण्यात आल्याची चर्चा देखील सुरू आहे.रेड्डी यांच्यावरील कारवाईनतंर अनेक वास्तुविशारद परदेशात पळून गेले होते.मात्र कालांतराने प्रकरण निवळल्याचे समजून ते परतले होते.
नालासोपारा पूर्व परिसरातील अग्रवाल नगरी येथील ४१ अनधिकृत इमारती जमीनदोस्त केल्यानंतर सक्त वसुली संचलनालयाने ( ईडी ) या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती.माजी नगरसेवक सीताराम गुप्ता याने या अनधिकृत इमारती बांधल्या होत्या.याप्रकरणात महापालिकेचे अधिकारी आणि नगररनचा उपसंचालक वाय.एस.रेड्डी जबाबदार असल्याची तक्रार माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी ईडीकडे केली होती.येथील रहिवाशांना बेघर करण्याचे षडयंत्र आखण्यात आले असून त्याची चौकशी करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली होती. त्यानुसार मार्च महिन्यापासून ईडी या प्रकरणाची चौकशी करीत होती.
ईडीच्या पथकाने १४ मे रोजी वसई,विरार शहरासह १३ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून चौकशी सुरू केली होती.याच दरम्यान वसई, विरार महापालिकेचे नगररचना विभागाचे उपसंचालक वाय. एस.रेड्डी यांच्या मूळ हैदराबाद येथील निवासस्थानीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली होती.या कारवाई रेड्डी यांच्या घरातून सुमारे ८ कोटी ६ लाख रु. रोख रक्कम आणि २३ कोटी २५ लाख रु.चे हिरेजडित दागिने आणि सोने जप्त करण्यात आले होते.त्याशिवाय अनेक गैरप्रकाराशी संबंधित विविध कागदपत्रे जप्त करण्यात आली.आजच्या या कारवाईमुळे अनेक बिल्डरांचे धाबे दणाणले असुन अनेक बिल्डर टिडीआर,एफएसआय व अनधिकृत बांधकाम या गैरप्रकारात अडकले आहेत. येत्या काही दिवसात ईडी त्यांच्याही मुसक्या बांधणार आहे.

