नवीन पाटील,सफाळे
बॉम्बची ती धमकी अखेर ठरली अफवा…
लघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल आल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.हा सर्व प्रकार ” मॉक ड्रिल,” चा प्रकार असावा,असे सुरुवातीला वाटत होते.परंतु नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आकाश भास्करन डीएमके केविंग केअर,या नावाने हा ई-मेल आल्याचे अधिकृतपणे सांगण्यात झाले.अखेर बॉम्ब ठेवल्याची अफवा असल्याचे सायं.पाच वाजता निष्पन्न झाल्यावर दिवसभरातील घडामोडीवर अखेर पडदा पडला.त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात जाण्याची मुभा देण्यात आली.
मुंबईतील ताजमहल हॉटेल आणि विमानतळ बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी गेल्या दोन दिवसांपूर्वीच मिळाली होती. त्यानंतर आता पालघर जिल्हा मुख्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आल्याने आणि हा ई-मेल खरा असल्याचे स्पष्ट झाले व मुख्यालय संकुलातील सर्व इमारती रिकाम्या करण्यात आल्या होत्या.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू होता.जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. बॉम्ब शोध पथक, श्वानपथकातर्फे शोध घेण्यात येत होता.जिल्हाधिकारी कार्यालयात काल सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी ई-मेल आला होता.सकाळी कार्यालय सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सकाळी ११.०० च्या सुमारास हा ईमेल तपासल्यानंतर सर्वांना धक्का बसला.पोलिसांनी या ई-मेलची तपासणी केल्यानंतर तो खरा असल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग ” ॲक्शन मोड,” वर आले होते.
जिल्हा मुख्यालयातील जिल्हाधिकारी कार्यालय, दोन्ही प्रशासकीय इमारती, जिल्हा परिषद कार्यालय आदी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यालयाबाहेर काढून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते.जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांनाही कार्यालयापासून लांब थांबवून ठेवण्यात आले होते.
यानंतर संपूर्ण जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला.सावधगिरीचा इशारा तसेच आपत्कालीन परिस्थिती आराखड्यानुसार आवश्यक ती पावले उचलली जात होती. जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा व इतर संबंधित यंत्रणा सतर्क झाल्या.पालघर पोलिसांनी आयोजित केलेली पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. तारापूर औद्योगिक वसाहतीत घडलेल्या एका गंभीर गुन्ह्याच्या तपासात मिळवलेल्या यशाची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.परंतु जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानंतर सर्व पोलिस यंत्रणा गुंतून पडली व पत्रकार परिषद रद्द करण्यात आली.
पालघर जिल्ह्यात तारापूर अणुऊर्जा प्रकल्पासह अनेक महत्त्वाची आस्थापने असून जिल्हा मुख्यालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्यामुळे आता सर्व यंत्रणा सक्रिय झाल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाला आलेल्या ई-मेल मध्ये सायंकाळी ०४ वाजून ३० मिनिटांनी बॉम्बस्फोट होईल,असे नमूद करण्यात आले होते.जिल्हाधिकारी कार्यालयाची संपूर्ण तपासणी सुरू करून या संकुलातील कानाकोपरा धुंडाळला जात होता.परंतु पोलिस यंत्रणेला संशयास्पद काहीही आढळलेले नाही.
अखेर बॉम्ब ठेवल्याची अफवा असल्याचे सायं. पाच वाजता निष्पन झाले.
