सुरेश वैद्य,सफाळे,
जनता दरबारास नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद,
प्रत्येक अधिकारी व कर्मचारी हे जनतेचे सेवक आहेत.तसेच हे आपल्याच कुटूंबाचे घटक आहेत,हे नागरिकांनी लक्षात घ्यावे.तसेच शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी नागरिकांची कामे तत्काळ करावी,अशा सूचना वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज जनता दरबारामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच तक्रारी अर्जावर तत्काळ निर्णय घेण्यासाठी वनमंत्री तथा पालघर जिल्हयाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समिती सभागृह,पालघर येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री गणेश नाईक यांनी अभिवादन केले.
या जनता दरबारामध्ये विविध शासकीय विभागातील एकूण २० टेबल उभारण्यात आले होते.यावेळी जनता दरबारास नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला.सुरुवातीला नागरिकांना टोकन वाटप करण्यात आले.त्यानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करून संबंधित विभागाकडे सदर तक्रारी अर्ज पाठवण्यात येत होते.
या जनता दरबारात एकूण ७४१ नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या.त्यापैकी ३६ तक्रारी अर्जाचे आजच निवारण करण्यात आले असून ७०५ तक्रारी अर्ज प्रलंबित आहेत.सदर अर्जांचे पुढील जनता दरबारात निराकरण करण्यात येईल,असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
या जनता दरबारास खा.डॉ.हेमंत सवरा,आ.राजेंद्र गावित,आ.हरिश्चंद्र भोये, आ.स्नेहा दुबे-पंडीत, आ.निरंजन डावखरे, आ.राजन नाईक, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे,तसेच विविध विभागातील विभाग प्रमुख उपस्थित होते.

