वसंत भोईर,वाडा,
प्रिंट मिडीयाचे महत्व भविष्यातही कायम असेल – प्रा. डॉ.किशोरी भगत
आज डिजिटल व इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे युग असले तरी प्रिंट मिडीया व वृत्तपत्राचे महत्व भविष्यातही कायम राहील,असे प्रतिपादन डॉ.शांतीलाल देवशी कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.किशोरी भगत यांनी केले.डॉ.देवशी महाविद्यालय आणि वाडा तालुका पत्रकार संघातर्फे आज पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अशोक पाटील होते.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कौशल्य शिकता येणार आहे.मुख्य पदवीसोबतच पत्रकारितेचेही शिक्षण घेता आले तर पत्रकारिता क्षेत्राचा करियर म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळू शकेल. पत्रकारितेत असलेल्या उपस्थित पत्रकारांच्या अनुभवाचा विद्यार्थ्यांना फायदा होण्यासाठी महाविद्यालयाने पत्रकार दिनाचा कार्यक्रम संयुक्तपणे साजरा करण्याचा निर्णय घेतला.अन्य क्षेत्रांचीही विद्यार्थ्यांना माहिती व्हावी,हा यामागे उद्देश असल्याचे डॉ. भगत म्हणाल्या,
आज डिजिटल मिडियाचा बोलबाला असला तरी प्रिंट मिडीया व वृत्तपत्र आजही परिणामकारक व अधिक विश्वासार्ह असल्याचे मत प्राचात्य डॉ.भगत यांनी मांडले.
यावेळी पत्रकारिता क्षेत्रातील संधी आणि वाचन प्रेरणा याविषयावर ज्येष्ठ पत्रकार जयेश शेलार,युवराज ठाकरे, वैभव पालवे,श्रीकांत भोईर, दीपेश पष्टे,यांनी आपले विचार मांडले.याप्रसंगी पत्रकार दिलिप पाटील,वसंत भोईर, अनंता दुबेले,जयेश घोडविंदे, अनिल पाटील,किरण दुपारे, प्रा.डॉ.सुरेंद्र खांडेकर,प्रा.डॉ. जयश्री कवठेकर,प्रा.डॉ. चव्हाण,प्रा.अनुप पानसरे,प्रा. बोंद्रे,प्रा.जोशी,आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रा.डॉ.कैलास जोशी,यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ. किरणकुमार कवठेकर यांनी केले.

