अनिल वैद्य,नाशिक,
वाढवण बंदर देणार नाशिकच्या विकासाला बूस्टर डोस,
मुंबई लगत डहाणू – वाढवण समुद्रकिनारी होऊ घातलेले वाढवण बंदर उत्तर महाराष्ट्रासह नाशिकच्या आर्थिक विकासाला बूस्टर डोस देणारे ठरणार आहे.जिल्ह्यातील निर्यातदारांचा खर्च २५ टक्के कमी हाेणार असून,त्यातूुन तयार होणाऱ्या व्यवसायाच्या संधी साधत उद्योजकांनी या आर्थिक कुंभमेळ्यात सहभागी व्हावे,असे आवाहन जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटीचे चेअरमन उन्मेष वाघ यांनी केले.

मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित कर्मवीर ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ” वाढवण बंदर-एक व्यावसायिक संधी,” या विषयावर नुकताच उद्योजकांशी संवाद साधल्यानंतर आयोजीत पत्रकार परीषदेत त्यांनी ही माहिती दिली.” मेक इन इंडिया, ” व ” आत्मनिर्भर भारत,” या संकल्पनांचा लाभ संपूर्ण देशाला होणार असून,यामध्ये महाराष्ट्राचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे.वाढवण बंदरामुळे लाखो रु.ची गुंतवणूक या परिसरात होईल,सुमारे १२ लाख रोजगार निर्माण होणार आहेत,असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
उन्मेष वाघ यांनी नमूद केले की,हा प्रकल्प नाशिकच्या औद्योगिक व कृषी व्यवसायाच्या उन्नतीसाठी स्थानिक पातळीवरील रोजगारनिर्मिती तसेच जागतिक स्तरावरील व्यापार व कनेक्टिव्हिटीमुळे नाशिकचे महत्त्व वाढवणारा ठरेल.” ग्रीन आणि ग्रोथ,” या संकल्पनेतून विकासाच्या दिशेने मोठी पावले उचलणारा हा प्रकल्प असून नाशिकची द्राक्षे आणि कांदा निर्यात करताना शेतकऱ्यांना येणारा खर्च २५ टक्के तरी कमी होणार आहे.उत्पन्नाबरोबरच देशाच्या सकल उत्पन्नात त्यामुळे मोठी वाढ होईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमास मविप्रचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,उद्योजक जीतूभाई ठक्कर,प्राचार्य डॉ.प्रशांत पाटील,मराठा उद्योजक विकास मार्गदर्शन संस्थेचे जिल्हाध्यक्ष उमेश शिंदे, विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे आदि उपस्थित होते. सचिन अहिरराव यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
प्रकल्पाची वैशिष्ट्ये अशी…
प्रकल्पासाठी ७६,२०० कोटी रु.खर्च,
भारतातील सर्वात मोठे खोल पाण्यात उभारण्यात येणारे बहुद्देशीय बंदर,
जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्याबरोबर आर्थिक वाढीला चालना,
२०४७ पर्यंत विकसित भारत दृष्टिकोनासाठी महत्त्व पूर्ण प्रकल्प,
आंतरराष्ट्रीय शिपिंग मार्गांना थेट कनेक्टिव्हिटी
बंदरात डीप बर्थ,कार्यक्षम कार्गो हाताळणी सुविधा आणि आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली,
स्थानिक व्यवसायांना चालना
पहिला टप्पा २०२८ पर्यंत पूर्ण होणार आहे,
चौकट
मत्स्यपालन…
७५७.२७ कोटी रु.च्या मत्स्यपालन प्रकल्पांची पायाभरणी,
मासेमारी बंदरांचे आधुनिकीकरण आणि फिश मार्केटचे बांधकाम याचा प्रकल्पमध्ये समावेश आहे,
मासेमारी बोटींवर ट्रान्सपॉन्डर बसवण्याचा शुभारंभ,
स्वदेशी ट्रान्सपॉन्डरमुळे समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना संकटकाळात संपर्क साधण्यासाठी अद्यायावत यंत्रणा,

