सविता केळकर यांच्या फेसबुक वॉल वरून,
मोटरमन दररोज नवीन मरण बघत असतो…..
सीएसटीवरून शेवटची लोकल निघते,१२.३७ ला आणि ती शेवटची लोकल असते.१२ वाजून ३७ मिनिटांनी निघालेली ही लोकल तीनच्या सुमारास कर्जतला पोहोचते. तेथून ती रिटर्न निघते,साधारणपणे साडेचारच्या सुमारास.मधल्या काळात मोटरमन आणि गार्ड आराम करतात,ते त्यांच्यासाठी खास बनवलेल्या रेस्ट रुम मध्ये.प्रत्येक मोटरमन आणि लोकल गार्ड यांच्यासाठी ड्युटी अवर्स असतात,फक्त चार तास.हे चार तास ट्रेनच्या रनिंग टाईमनुसार मोजले जातात.त्यात ट्रेन कुठे व किती वेळ थांबली,वगैरे ग्राह्य धरलं जात नाही.पण त्या चार तासात पूर्ण वेळ डोळ्यात तेल घालून एकटक एका नजरेनं एकाच दिशेत सतत पाहत राहणं,योग्य अंतरावर प्रॉपर नोटिफिकेशन देणं,दर चारशे मीटरवर येणाऱ्या सिग्नलला तपासणे,शिवाय प्रत्येक स्पीड इंडिकेटरवर लक्ष ठेऊन स्पीड मेंटेन करणे,अतिशय महत्त्वाचं असतं.रात्रीच्या वेळेस हे काम फार जिकीरीचं असतं.जर स्पीड ४० ऐवजी ४२ वर जरी गेला तरी मोटरमन आणि गार्ड यांना कंट्रोल रुमकडून ताकीद जाते.ड्युटी संपल्यावर त्याचं लेखी कारण द्यावं लागतं. एखाद्या वेळेस मोटरमनकडून सिग्नल असताना जरी ट्रेन क्रॉस केली गेली तर,अवघ्या पाचशे मीटर अंतर पुढे गेल्यावर ट्रेन आपोआप बंद होते.नवीन मोटरमन बोलावला जातो.चूक झालेल्या मोटरमनला आणि गार्डला आधी सस्पेंड केलं जाते.मग चौकशी आयोगाला सामोरं जावं लागतं.चौकशी आयोगाच्या फेऱ्यात रेल्वे कर्मचारी अडकला की त्याचं त्यातून सुटणं मुश्किल असतं. तर या अशा वाहनचालकांच्या बाबतीतलं थोडंसं.
मी अनेकदा यांच्या रेस्ट रुम मध्ये शिरून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. स्वभावाने बरे असतात.पण खूप अबोल असतात.रोज रोज एकच रस्ता,तेच रुटीन,तेच सिग्नल,तेच काम त्यांच्या स्वभावाच्या एकसुरीपणाला कारणीभूत असेल असं वाटलं होतं.पण खरं कारण वेगळंच होतं.त्यातील काहींनी सांगितलेली कारणे फार भयानक अशी होती.प्रवासी फुटओव्हर ब्रीजचा वापर करत नाहीत.सतत अपघात होत असतात. वारंवार हाय डेसीबलचा हॉर्न वाजवून आमच्या कानांचे पडदे फाटतात,पण बेजबाबदार प्रवाशांना स्वतःची काळजी घ्यावीशी वाटत नाही.काही लोक आत्महत्या करण्यासाठी लोकलसमोर निर्धास्तपणे येऊन उभे राहतात.काही मान रुळावर ठेऊन झोपून जातात.काही संडास करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर बसतात,ते ही कानाला हेडफोन लावून.रेल्वे क्रॉसींग करताना कानात हेडफोन लावतात.त्यांचं चिरडलं जाणं, कापलं जाणं,तुकडे तुकडे पडलेले शरीर आम्हाला दर दोन ते तीन दिवसाआड एकदा तरी पहावंच लागतं.जेव्हा जेव्हा कुणी आत्महत्या करतं, ट्रेनमधून पडून मरतं, क्रॉसिंगच्या वेळेस मृत्यूमुखी पडतं,तेव्हा आमचं हृदय काही काळासाठी स्टॉप झालेलं असतं.पण ट्रेन चालू असते. लगेच भानावर यावं लागतं. डोळेसुद्धा मिटता येत नाहीत. सिग्नल चुकवायचा नसतो. नाहीतर मोठ्या अनर्थाला सामोरं जावं लागू शकतं. पाहीलेला आघात कडु घोटासारखा गिळावा लागतो.थोडाही वेळ मिळत नाही, स्वतःला सावरायला.
एकदा मोटरमनच्या कोचमधून प्रवास करत असताना एका मुलाने अगदी ऐन वेळेला ट्रॅक क्रॉस केला.थोडक्यात बचावला.ट्रेन साधारण ऐंशीच्या स्पीडला होती. मोटरमन भलताच वैतागला. खिडकीच्या बाहेर डोकं काढून त्या पोराला मजबूत शिव्या हासडल्या.म्हणाला,” मेरी ही ट्रेन मिली थी क्या तुझे मरने के लिए ? ” त्याचं हे बोलून होईपर्यंत गाडी बरीच पुढे निघून गेली होती.त्याचं बोलणं काय त्या मुलाला ऐकू जाणार नव्हतं.पण तरी मनातला राग व्यक्त करण्याचा त्याचा हा प्रयत्न होता.असो,
लास्ट लोकलच्या प्रवासात रुटीन अपघात होत असतात. कुणी दारातून पडतं तर कुणी ट्रेन पकडण्याच्या नादात पडतं.तर कुणी लोकल सायडींगला लावल्यावर झोपायला मिळावं म्हणून अपोझिट साईडनं चालती ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात चाकांमध्ये अडकतं.काही पोलिसांचा अटकाव नको म्हणून टपावर लपून बसतात. काही कपलिंगच्या स्पेसमध्ये लपतात.लपणारे,चढणारे तीनेक तासांसाठी आसरा शोधत असतात.काहींना ड्रग्ज घ्यायची असते,काहींना चरस ओढायची असते तर काहींना नेलपेंट रिमुव्हर हुंगायचा असतो.साईडिंगच्या ट्रेनमधलं अंधारं जग काही कुरापत्या करून बसलं तर त्याचा जाब लोकल गार्ड आणि मोटरमनलाच विचारला जातो. भले त्यांचा त्यात काही हात नसला तरी..
असाच एकदा रिटायर्ड मोटरमन लोकांच्या मेळाव्याला मी गेलो होतो.तेव्हा त्यात गर्दी बरीच कमी होती.काही आकडेवारी काढली.२००८ सालची गोष्ट,त्यात जवळपास नव्वद टक्के मोटरमन हार्ट अटॅकने गेलेले आढळले. त्यातील अनेकांच्या सर्विस सुद्धा पूर्ण झालेल्या नव्हत्या. मरणारा माणूस एकदाच मरतो.मोटरमन रोज नवीन मृत्यू पाहत असतो.रात्रीच्या वेळेस रेस्टरुम मध्ये असणारे मोटरमन झोपत नाहीत.त्यांना झोप लागत नाही.ते कुठे ना कुठे गाडीखाली येऊन मरणाऱ्या माणसासाठी स्वतःलाच दोषी धरत असतात.चूक त्यांची नसतेच मुळात… बेजबाबदार प्रवाशांसाठी ते लोकलमध्ये असलेल्या हजारोंचं प्राण तर पणाला लावू शकत नाहीत.
सविता केळकर यांच्या फेसबुक वॉलवरून साभार।

