दीपक मोहिते,
जीवनाचा एक अविरत संघर्ष…
प्रत्येकाच्या आयुष्यात किमान एक तरी ‘ बॅड पॅच,’ येतो.
शांत सुरळीत सुरु असलेल्या आयुष्यात आपल्या करीयरमध्ये काहीतरी बिघडतं,
नात्यांमध्ये काहीतरी बिघडतं,
व्यवहारांचा काहीतरी लोच्या होतो,
पैशांची बिकट वाट लागते.नड येते,
आणि बहुदा हे सारं एकदमच,एकाच वेळी घडतं..!!
हा असा बॅड पॅच आला की तो आपल्या आयुष्यात महिना दोन महिने किंवा क्वचित दोन चार वर्षंही रेंगाळतो… आपलं आयुष्य आंतर्बाह्य हालवून टाकतो… आयुष्य नकोसं करुन सोडतो…
आपण कितीही नको म्हंटलं,टाळायचं ठरवलं तरी हा असा बॅड पॅच येतोच येतो.
संपूर्ण आयुष्यात एक-दोन-चार-सहा कितीही वेळा येतो,अन आपल्याला तो भोगावा, व अनुभवावाच लागतो.कितीही नकोसा वाटला,कितीही त्रास झाला तरी या बॅड पॅचचे काही विलक्षण फायदेही असतात!!
यामध्ये दोन प्रमुख फायदे म्हणजे,
१.खरोखर आपलं कोण आहे आणि कोण नाही, हे बॅडपॅच असतानाच कळतं…आपल्या वाईट आणि पडत्या काळातही कोण आपल्या सोबत खंबीरपणे उभं रहातं, कोण आपला हात सोडत नाही,कोण आपल्या पाठीशी आधार देत उभं रहातं हे फक्त बॅडपॅच असतानाच उमगतं..!
२.आपली स्वतःची आपल्याला नव्यानं ओळख होत राहते.
अत्यंत वाईट परिस्थितीत आणि प्रसंगांत आपण कसे वागतो,काय बोलतो,काय करतो,
काय निर्णय घेतो,
हे आपलं आपल्याला समजू शकतं.
आपली शक्तीस्थळं आणि मर्यादा यांची नव्यानं जाणीव होते.क्रिकेटर, व्यापारी,कलाकार,राजकारणी,सामान्य माणसं,असे कोणालाच यापासून वाचता येत नाही.मात्र,हा वाईट काळ प्रत्येकाला काहीतरी शिकवून जातो.
यामुळे स्वतःविषयीचा विश्वास वाढतो आणि जगण्याविषयीची नम्रताही येत राहते…!
अर्थात,बॅडपॅच येणंही आपल्या हातात नाही आणि टाळणंही आपल्या हातात नाही.पण तो जेंव्हा येतो,तेंव्हा त्याला प्रतिसाद कसा द्यायचा रीऍक्ट कसं करायचं,हे आपल्या हातात असतं…आपला बॅडपॅच आहे,हे नाकारून उद्दामपणे जगत रहायचं आणि स्वतःचं नुकसान करत रहायचं का तो स्विकारून नम्र व्हायचं,आत्मपरीक्षण करायचं आणि स्वतःत बदल घडवत सजग जगायचं,हे आपल्याच हातात असतं.
असो,आपणा सर्वांच्या आयुष्यात कमीत कमी बॅडपॅच येवोत आणि जे येतीलच त्यांमधून आपलं आयुष्य अधिकाधिक समृद्ध करण्याची ताकद आपणां सर्वांना लाभो…!संघर्षातून जीवन जगण्याची मजा काही औरच असते…..
प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा शिक्षक असतो.शिक्षक हे फक्त आपले भरकटलेपणा दाखवतात,यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो.
तुमचं आयुष्य कधीही मित्र,कंपनी, जॉब,बॉस बदलल्यामुळे बदलत नाही.ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही बदलता तेव्हाच.
तुम्हाला जर कोणी प्रगतीपासून रोखु शकतो तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतःच, कंटाळा,आळस,नाकर्तेपणा,प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे,हे फक्त तुम्ही स्वतःसाठी करत असता.
मी गरीब आहे.पैसा नाही,हे नाही,ते नाही म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करत नाहीत,पण मजबुरीचा फायदा घेतात.स्वतःला मजबुत करा,मजबुर नाही.
ज्यांची वेळ खराब आहे,त्याच्याबरोबर माणसाने जरूर रहावे.पण ज्याची नियतच खराब असते,त्याची सोबत सोडणेच चांगले असते…..
चांगल्या कामात निर्लज्ज व्हा.मान,सन्मान, इगो,मोठेपणा,अहंकार सर्व सोडा.फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा.शेंडी तुटो वा पारंबी ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचेच.
संकटे आली,अडचणी आल्या,विरोध झाला, अपमान झाला,कोणी नावे ठेवली,पाय ओढले, अडवले,थांबवले,असे काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडु नका.समोरची व्यक्ती कितीही बाहुबली असली तरी आपण आपला स्वाभिमान गहाण ठेवू नका,त्यांच्याशी दोन हात करा..
त्यासाठी स्वतःच्या मनाला कायम म्हणत रहा कि समोरच्या बाहुबली व्यक्तीने कितीही आणि काहीही करू द्या,पण अंतिम विजय माझाच आहे.हा घटनाक्रम, आपल्या जीवनातील एक अविरत असा संघर्ष आहे,या संघर्षात स्वाभिमानी माणूस कधीही पराभूत होत नाही,हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

