दीपक मोहिते,
देश उद्या महामानवाची १३५ वी जयंती साजरी करणार आहे,
डॉ.भीमराव आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जातात.ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री देखील होते.भारताचे संविधान तयार करण्यात त्यांचे फार मोठे योगदान होते.पण जगाला मार्गदर्शक ठरलेले आपले संविधान आता धोक्यात सापडले आहे.या महान दस्ताऐवजाच्या गळ्याला नख लावण्यासाठी काही शक्ती सक्रिय झाल्या आहेत. पण ते त्यांना कदापि शक्य होणार नाही.कारण या संविधानाशी १४० कोटी जनतेचे भावनिक नाते आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी १४ एप्रिल रोजी देशभरात साजरी केली जाते.यंदा संपूर्ण देश त्यांची १३५ वी जयंती साजरी करत आहे.डॉ.भीमराव आंबेडकर ज्यांना बाबासाहेब म्हणूनही ओळखले जाते.ते एक प्रख्यात विद्वान,वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी होते.ज्यांनी सामाजिक न्याय आणि समानतेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते.त्यांची जयंती सामाजिक सलोखा आणि एकता,यासाठी एकत्र येण्याचा दिवस म्हणून साजरी केली जाते.
डॉ.आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील एका महार कुटुंबात झाला.त्यावेळी भारतातील जातिव्यवस्था अतिशय कठोर असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच भेदभावाला सामोरे जावे लागले.मात्र,त्यांनी शिक्षण क्षेत्रात खूप मेहनत घेतली आणि परदेशातही शिक्षण घेतले.त्यांनी शिक्षणात प्रावीण्य मिळवले आणि कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली.याशिवाय लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर ते भारतात परतले आणि कायद्याचा सराव सुरू केला. दलित समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांनी जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला आणि शिक्षण आणि रोजगाराच्या संधींमध्ये समानतेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. डॉ.आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या उत्थानासाठी अनेक चळवळींचे नेतृत्व केले. भारतीय संविधानात आरक्षण प्रणाली समाविष्ट करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.ते संविधानातील मूलभूत अधिकार आणि संघराज्य रचनेचे खंबीर पुरस्कर्ते होते.
सर्व नागरिकांना समानता, स्वातंत्र्य,न्याय आणि समान संधी प्रदान करणाऱ्या संविधानाच्या निर्मितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १९४६ मध्ये संविधान सभेसाठी निवडून आले. मूलभूत अधिकार,संघराज्य रचना आणि अल्पसंख्याक आणि वंचितांसाठी संरक्षण यासारख्या महत्त्वाच्या तरतुदींचा समावेश करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.त्यांनी विशेषत: धार्मिक स्वातंत्र्य,अस्पृश्यता निर्मूलन आणि शोषणापासून संरक्षण यांसारख्या अधिकारांवर भर दिला.एक मजबूत केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये अधिकारांचे विभाजन सुनिश्चित करण्यासाठी बाबासाहेबांनी संघराज्य पद्धतीचे समर्थन केले.अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षणासाठी देखील त्यांनी कार्य केले.भारतीय इतिहासातील एक महत्त्वाची व्यक्ती,आंबेडकर हे एक न्यायशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक देखील होते. ज्यांनी दलित यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी, महिला आणि कामगारांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी आपले जीवन समर्पित केले.
आंबेडकर जयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.या दिवशी लोक डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्या विचारांचे स्मरण करतात.शैक्षणिक संस्था,सरकारी कार्यालये आणि सामाजिक संस्थांमध्ये त्यांच्या जीवनावर आणि कार्यांवर चर्चासत्रे,व्याख्याने आणि कार्यक्रम आयोजित केले जातात.डॉ.आंबेडकरांचा वारसा भारतासाठी अनमोल आहे.बाबासाहेबांचे संविधान आजही भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा पाया आहे. देशभरात सार्वजनिक सुट्टी असते.आंबेडकर जयंती समता दिवस म्हणूनही ओळखला जातो,कारण बाबासाहेबांनी आयुष्यभर समानतेसाठी लढा दिला तसेच कायद्याच्या दृष्टीने सर्व भारतीय नागरिकांना न्याय देण्यावर त्यांचा भर होता.

