दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
नेत्यांच्या गाठभेटी केवळ विचारपूस करण्यासाठी : नेत्यांचे दावे निखालस खोटे,
राजकीय नेते एकमेकांच्या भेटी झाल्यानंतर बाहेर येऊन माध्यमांसमोर या भेटीत राजकीय विषयावर आमची चर्चा झाली नाही.आमची ही भेट वैयक्तीक स्वरूपाची भेट होती,असे सांगायला विसरत नाही आणि आपले चॅनेलवाले त्यांच्या या प्रतिक्रिया वारंवार दाखवण्यात धन्यता मानत असतात.नेत्यांच्या या गाठीभेटी या महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठीच असतात,पण ही मंडळी लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी या भेटींना वेगळे स्वरूप देत असतात.
राजकीय नेत्यांच्या भेटी या ” आज तुझ्याकडे जेवणात काय बनवले आहे ? सकाळी नाश्ता काय केलास ? आज दिवसभर तुझा काय प्रोग्राम आहे ? अशी विचारणा करण्यासाठी असते,असे लोकांनी मानायचे का ?आज उद्योगमंत्री उदय सामंत हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शिवतीर्थ,या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.या भेटीचा उद्देश त्यांनी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामासंदर्भात चर्चा करण्यासाठी होती,असे सांगायला ते विसरले नाहीत.तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीही त्यांची री ओढली.चंद्रशेखर बावनकुळे हे चॅनेलवाल्याना प्रतिक्रिया देण्यासाठी कायम हजर असतात.बावनकुळे यांच्या प्रतिक्रियाही अतिशय मजेशीर असतात.” कोणाची भेट घेणे,हे काही गैर नसते.अशा गाठीभेटी होतच असतात.” ही अशी ठराविक व मासलेवाईक उत्तरे ते कायम देत असतात.भाजप व एकनाथ शिंदे यांचा गट सध्या राज ठाकरे यांची पाठराखण करू लागले आहेत.कारण उद्धव ठाकरे पुन्हा ” हिंदुत्व व मराठी अस्मिता,” या प्रमुख मुद्द्याकडे पुन्हा वळू लागल्यामुळे आपल्याला महानगरपालिका निवडणुकीत त्याचा फटका बसू शकतो,अशा भितीतून या दोन्ही पक्षांनी राज ठाकरे यांच्याशी चुंबाचुंबी करण्यास सुरुवात केली आहे.पण राज ठाकरे यांची वारंवार बदलत असलेली राजकीय व तळ्यात-मळ्यात अशी भूमिका ही महायुतीला फायदेशीर ठरण्याऐवजी मारक ठरण्याची शक्यता अधिक आहे.मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली होती.राज्यस्तरीय नेते यांना राज ठाकरे यांना सोबत घेण्याची प्रबळ इच्छा आहे,पण स्थानिक पातळीवरील त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे मात्र ” मनसेची साथसंगत नको रे बाबा,” अशा मनस्थितीत आहेत.

