दीपक मोहिते,
सरकार आपल्याच मस्तीत धुंद,
राज्यात पावसाचा धुमाकूळ ; यंदा शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये वाढ होणार…
राज्यात सुरू असलेला पावसाचा धुमाकूळ हा शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे.पंजाब,हरियाणा,
उत्तराखंड व आपल्या महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टीने या सर्व राज्यात हाहाकार उडाला आहे.मे महिन्याच्या अखेरीस सुरू झालेला पाऊस सप्टें.महिना उजाडला तरी थांबायचे नाव घेत नाही.अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास आपल्या राज्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यामध्ये लक्षणीय वाढ होईल,अशी भिती सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यात कोसळणाऱ्या पावसाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे.पण आपले तीन इंजिनचे सरकार मात्र आपल्याच धुंदीत असल्याचे पाहायला मिळत आहे.यंदा कोसळलेल्या या अस्मानी संकटामुळे गलितगात्र झालेल्या आपल्या शेतकऱ्याला आधाराची गरज आहे.पण आपले सरकार राजकारणाच्या बुद्धिबळपटावर अन्य खेळी खेळण्यात मग्न आहे.राज्याच्या अनेक जिल्ह्यात केळी,सोयाबीन,भात व बागायती उत्पन्न,होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जमीनदोस्त झाली आहेत.अशा या दुर्धर प्रसंगात स्थानिक आमदारांनी सरकार दरबारी शेतकरी व बागायतदारांची कैफियत मांडण्याची गरज होती.पण आपले आमदार व मंत्री कोटी कोटीची उड्डाणे घेण्यात धन्यता मानत आहेत.राज्यातील तमाम शेतकऱ्यासमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा ठाकला असताना आपले सरकार आरक्षण,लाडक्या बहिणी व अन्य जीवघेण्या राजकारणात रमले आहे.ग्रामीण भागातील कृषी क्षेत्राचे झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामे करणे,अशी कामे सुरू होण्याची गरज आहे,पण आपले सरकार ” आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” अशा घोषणा करण्यात धन्यता मानत आहे.सध्या जी मुसळधार वृष्टी होत आहे,त्यास सरकारी भाषेत ” परतीचा पाऊस,” म्हंटले जाते.पण,परतीचा पाऊस दर दोन दिवसानंतर कसा परत येतो ? या प्रश्नाचे उत्तर सरकारकडे नाही.हवामानात होणारे बदल,पर्यावरणाचे बिघडत चाललेले संतुलन,प्रचंड प्रमाणात होणारी वृक्षतोड,इ.कारणे या संकटाला जबाबदार आहेत.राज्याचे पर्यावरण केवळ शोभेचे मंत्रालय ठरले आहे.सध्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांना पर्यावरण याविषयाशी काहीही देणेघेणे नाही,असे त्यांच्या एकंदरीत वागण्यावरून पाहायला मिळते.वास्तविक हा विभाग अत्यंत महत्वाचा तसेच संवेदनशील,असा आहे.या विभागाच्या माध्यमातून खूप काही करण्यासारखे आहे,पण मंत्र्यांकडून काहीही करण्यात येत नाही.पर्यावरणमंत्री हे पद केवळ मिरवण्यासाठी आहे,असा गोड गैरसमज या पदावर आजवर विराजमान झालेल्या प्रत्येक मंत्र्याने करून घेतला आहे,त्याची फळे मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भोगावी लागत आहेत.

