दीपक मोहिते,
” विध्वंस,” भाग क्र.२,
त्यावेळी कटकारस्थाने झाली नसती तर आज हिरवीगार वसई पाहायला मिळाली असती….
त्यावेळी तयार करण्यात आलेला प्राधिकरणाचा विकास आराखडा काही आर्किटेक्टस यांनी मिळवला,त्यातील तरतुदीचा बारकाईने अभ्यास केला.हा विकास आराखडा वसई/विरार उपप्रदेशाला हानिकारक असल्याचे त्यांचे ठाम मत बनले.प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी उपप्रदेशाची भौगोलीक रचना लक्षात न घेता तसेच वातानुकूलित कार्यालयात बसून तयार केला होता.तसा
आरोप देखील अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी केला होता.सरकारने या आराखड्यात चांगलीच हातचलाखी करत बराचसा हिरवा भाग घरबांधणीसाठी मोकळा करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले.
हा विकास आराखडा बिल्डरधार्जिणा असल्याचा आरोप अनेक सामाजिक संघटनांनी केला,त्यानंतर वसईकर नागरीकामध्ये असंतोष खदखदू लागला. पाणी,सांडपाणी निचरा, मल:निसारण,डंपिंग ग्राउंड,प्रशस्त रस्ते,इ.पायाभूत सुविधा नसताना बाहेरुन लोकांचे लोंढे येतील व गावाचे गावपण हरवून जाईल.अशाप्रकारची भिती गावागावातील भूमिपुत्र व्यक्त करू लागली.या पायाभूत सुविधा उपलब्ध नसताना जनजीवन विस्कळीत तर होईलच,पण स्थानिक संस्कृती देखील लोप पावेल,अशा भितीने लोकांना ग्रासले.येथून सरकारच्या विकास आराखड्यास विरोध होण्यास सुरुवात झाली.गावागावातून चौक सभा घेऊन लोकांचे प्रबोधन करण्यास सुरुवात झाली.या चौकसभा अत्यंत उपयुक्त व प्रभावी ठरल्या. आपली भाषा व संस्कृती नष्ट होईल,अशा भितीतून लोकं एकत्र येत गेली व विरोधाला चांगलीच धार आली.लोकांचा वाढता प्रतिसाद पाहून सरकारचा हा विकास आराखडा स्थानिक भूमिपुत्रांना देशोधडीला लावणारा आहे,हे सांगण्यासाठी १ ऑक्टो.१९८९ रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.त्यासाठी प्रसिद्ध साहित्यिक विजय तेंडुलकर यांना मोर्चाचे आमंत्रण देण्यात आले.त्यांनी ते आमंत्रण मोठ्या मनाने स्विकारले.ही बातमी मुंबई च्या अनेक दैनिकातुन प्रसिद्ध झाली व आंदोलनाला प्रचंड बळ मिळाले.दुसरीकडे गावागावात जनजागरण करण्याच्या कामानीही वेग घेतला होता.लोकसत्ता दैनिकाचे संपादक माधव गडकरी यांनी ३० सप्टें.१९८९ म्हणजे मोर्च्याच्या एक दिवस अगोदर ” वसईचा आधुनिक संग्राम,” असे संपादकीय लिहिले.या त्यांच्या या एका लेखाने संपूर्ण वातावरण बदलून गेले.या लेखामुळे लोकांसमोर ” ग्रामीण भागाचे शहरीकरण ,” यामागचा सरकारचा काळाकुट्ट चेहरा पाहायला मिळाला.ही लढाई आपल्या
अस्तित्वाची आहे,वसईची मुंबई होऊ नये,असे वाटत असेल तर हा लढा असाच
सुरू ठेवा व अखेरपर्यंत लढा,असा संदेश तेंडुलकर यांनी आपल्या भाषणात दिला.तूमचा हा लढा यशस्वी झाला तरच हरित वसई टिकू शकेल.तुमचा हा लढा संपूर्ण देशासाठी रोलमॉडेल ठरू शकते,असे ते पुढे म्हणाले.त्या दिवशी निघालेल्या ऐतिहासिक मोर्च्यात सुमारे तीस हजार भुमिपुत्र सहभागी झाले होते.मोर्च्याला अभूतपूर्व असे यश मिळाले होते.पण त्याचवेळी काही शक्ती सक्रिय झाल्या होत्या.या शक्तींनी पुढे या चळवळीला अपशकुन करण्याचे पाप केले.जमिनीचा हव्यास व आपला वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी पडद्याआड कटकारस्थाने सुरू झाली.आज वसई तालुक्याची जी दुरावस्था झाली आहे,त्याची बीजे याच कटकारस्थानात पेरली गेली होती.
क्रमशः

