दीपक मोहिते,
राज्य विस्कळीत करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न,
” सत्तेसाठी काहीही,” हा वाक्प्रचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भाजप, समाज आणि धर्माधर्मात तेढ निर्माण व्हावी,यासाठी आता प्रयत्न सुरू केले आहेत.
घाटकोपर येथे मराठी कुटुंबियाना देण्यात आलेला त्रास,वक्फ कायद्यातील सुधारणा,राजभाषेवर राष्ट्र भाषेची कुरघोडी,या सर्व घडामोडीवरून भाजप महानगरपालिका निवडणुकीवर डोळा ठेवून या हालचाली करत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.
भाजप सत्तेसाठी जी खेळी करत आहे,ती विस्तवाशी खेळ करण्यासारखी आहे.घाटकोपर येथील गुजराती समाजाचे लोक ” आता बीजेपीची सत्ता आहे,” अशी जी धमकी मराठी कुटुंबाना धमकी देतात,हे कसले लक्षण आहे ? भाजप मधील आशिष शेलार,चन्द्रशेखर बावनकुळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार व शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे या अशा ज्वलंत प्रश्नी मूग गिळून बसले आहेत,हे महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने दुर्देव आहे.सरकार एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आपण मिळवला,असे सांगत स्वतःचा उर बडवून घेते,तर दुसरीकडे मराठी भाषेची गळचेपी करण्याचे षडयंत्र रचते,याला काय म्हणावे ? योग्य शब्दात सांगायचे झाल्यास ” केवळ नतद्रष्टपणा,” असेच म्हणावे लागेल.संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली,त्यांचा अशाप्रकारे अवमान करण्याचा अधिकार,या लोकांना कोणी दिला ? त्यावेळी झालेल्या लढ्यात भाजपचे किती योगदान होते ? या प्रश्नाचे उत्तर भाजपच्या नेत्यांकडे नाही.शेलार व बावनकुळे या दोघांना इतिहासाशी काहीही देणेघेणे नाही.केंद्र सरकारमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी तामिळनाडू राज्यात असे उपद्व्याप करून पहावेत.मराठी माणूस सोशिक आहे,पण तो भित्रा नाही,हे आजवर घडलेल्या अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे.त्यामुळे सरकारने मराठी-गुजराती वादात त्रयस्थाची भूमिका पार पाडावी.मताच्या जोगव्यासाठी समाज विस्कळीत करू नये.मराठी कुटुंबाना हीन वागणूक देणारी विषवल्ली वेळीच ठेचली नाहीतर ही पिल्लावळ वाढत जाऊन जे आपण मेहनतीने मिळवले,ते घालवून बसू.

